वर्तमान युगात ई-कॉमर्सचे महत्व
State Level Seminar on
`Importance of E-Commerce in Present Age'
organized by
Shri Shivaji College of Arts, Commerce
and Science , Akola
on dated
20 February 2007
*प्रास्ताविक*
डॉ.श्रीकृष्ण राऊत,
वाणिज्य विभाग प्रमुख,
श्री शिवाजी महाविद्यालय,
अकोला
एकविसाव्या शतकातल्या पहिल्या दशकात जागतिकीकरणाच्या संक्रमणात आपला देश आणि आपला प्रदेश ढवळून निघतो आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील वेगवान क्रांतीत आपण जे काल शिकलो आणि शिकविले ते आज कालबाह्य होऊ लागले आहे. प्रचंड वेगाने धावणा-या काळासोबत चालण्याची आणि विद्यार्थ्यांना सोबत नेण्याची शिक्षकांची जबाबदारी शंभर पटीने वाढली आहे. त्यासाठी उदासीनतेची आलेली मरगळ झटकून टाकावी लागणार आहे. आधुनिक शैक्षणिक साधनांचा उपयोग करावा लागणार आहे.
एकविसावं शतक हे इलेक्ट्रॉनिक युग आहे. इंग्रजीत त्याला e-century किंवा e-era म्हणता येईल. सकाळी सहा वाजता चहासोबत उपलब्ध होणारे वर्तमानपत्र आता पाच सहा तास अगोदर रात्रीच ई-पेपर म्हणून उपलब्ध होऊ लागले आहे. शिवाय इंटरनेटवर त्या वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर जिल्हानिहाय, प्रदेशनिहाय असलेल्या त्यांच्या विविध आवृत्याही उपलब्ध आहेत. अकोल्यासारख्या विकसनशील शहरामध्ये नजीकच्या काळात मध्यमवर्गीयांच्या घरापर्यंत पोहचणारी ब्रॉडबॅन्ड सेवा आपल्याला इंटरनेटच्या या महाजालाशी जोडणार आहे. इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या तुलनेत प्रिंट मिडियाचे महत्त्व कमी होणारे नसले तरी या बदलाच्या स्वागताकरिता आपल्याला तयार रहावे लागणार आहे.
शिक्षण, ग्रंथालय, प्रशासन, आरोग्य, विमा, बॅंकिंग, परिवहन, सिनेमा ही सगळी सेवा क्षेत्रे आता ई आद्याक्षरापासून सुरू होऊ लागली आहेत. संगणकीय साक्षरतेपाठोपाठ येणारी ई-साक्षरता वर्तमान युगात आपली महत्ता गाजवू लागली आहे. शिक्षणाकडे फार मोठे सेवा-व्यवसाय क्षेत्र म्हणून अख्ख्या जगाचे डोळे लागले आहेत. खाजगी विद्यापीठे आणि परदेशी गुंतवणुकीने स्थापन होऊ लागलेली परदेशी विद्यापीठे e-education मधून फारमोठी उलाढाल करणार आहेत. आपल्याकडे शिक्षण क्षेत्रात प्रवेश, निकाल, मार्कशीटस् हे ऑनलाइन सुरू झाले आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे आभासी वर्ग- virtue classes हा या प्रवासातला महत्वाचा टप्पा आहे. प्रज्ञा प्रबंधन- talent management ही नवी ज्ञान शाखा आपल्या उंबरठयावर उभी आहे. ई-लायब्ररी,ई-बुक्स, ई-जरनल्स हे तर ज्ञानदानाच्या क्षेत्रात दृकश्राव्य वरदानच म्हणावे लागेल.
तालुका-जिल्हा-विभाग-राजधानी-केंद्रसरकार अशी जोडणी करून ई-गव्हरन्स अतिशय प्रभावी पद्धतीने राबविले जात आहे. आरोग्य सेवेच्या क्षेत्रात टेलिकन्सलटेशन पासून तर हजारो मैल दूर बसलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन्स होऊ लागली आहेत. पैशाच्या आदानप्रदानात ई-बॅंकिंग आता आपल्या परिचयाचे होत आहे. रेल्वेचे रिझर्वेशन पोस्टात आणि मॉलमध्ये करता येणार आहे. प्रिंटसचा खर्च वाचविण्यासाठी आणि पायरसी टाळण्यासाठी आठ-दहा शहरामधील मल्टीप्लेक्स सिनेमागृहात एकाचवेळी उपग्रहाद्वारे सिनेमाचे प्रदर्शन करण्याचा प्रयोग नुकताच झाला आहे. संदेशवहनाच्या क्षेत्रात ई-मेल, सेलफोन ही आपली दैनंदिन गरज झाली आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेकडो मैल दूर असलेल्या माणसाची मुलाखत, कोर्टासाठी एखाद्याची साक्ष घेणे शक्य होऊ लागले आहे.
झेरॉक्स, फोटोग्राफी, ऑडियो-विज्युअल रेकॉर्डिंगपासून कितीतरी क्षेत्रे डिजिटल होऊ लागली आहेत. बोटाच्या स्पर्शाच्या इशा-यावर उघडणारी अत्याधुनिक ई-होम्स सध्या आपल्यापासून दूर असली तरी येणा-या काळात हे अंतर झपाट्याने कमी होणार आहे.
बृहत प्रमाणावर उत्पादन आणि गुणवत्ता नियंत्रण या दोन्ही पातळयांवर ई-कॉमर्स आपले इष्टांक गाठत आहे. वस्तुंच्या किंमतीवर नियंत्रण ठेऊनही लाभाचे प्रमाण सतत वाढते ठेवणे शक्य होत आहे. `सिमसिम खुलजा’ म्हटल्यावर उघडणा-या अलाउद्दीनच्या खजिन्यासारखे हे नवे श्रीमंत जग इलेक्ट्रॉनिक्सच्या तंत्रमंत्राने आपल्यासमोर खुले होणार आहे. हे खरे असले तरी खेड्यापाड्यात राहणा-या बहुजन समाजाला या महाजत्रेत कोणता मान असेल? त्यांच्या शेतीचे काय स्थान असेल? ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधावे लागणार आहे. विकासाचा वेग प्रभावित करणा-या वीज आणि पाणी या दोन मूलभूत उर्जास्रोतांची सध्याची अवस्था बिकट आहे. ग्रामीण भागातल्या अठरा तास लोड शेडिंगमुळे पिके नष्ट होत आहेत. हे सध्याचे भयाण वास्तव आहे. आठवड्याच्या सुटीला लागून आणखी एक दिवस असे आठवड्यात एकूण दोन दिवस कारखाने बंद ठेवण्याचा प्रयोग झाला. त्यामुळे उत्पादन व पर्यायाने पुरवठा कमी होईल. वाढत्या मागणीने किंमती वधारण्यावर त्याचा परिणाम होईल आणि महागाईच्या या दुष्टचक्रात सगळयात जास्त भरडल्या जाईल तो अत्यल्प क्रयशक्ती असलेला शेतकरी आणि शेतमजूर.
एकीकडे ‘विशेष आर्थिक क्षेत्राचे’ भूत शेतक-यांच्या मानगुटीवर बसू पाहते आहे. दुस-या बाजुने उत्पादन खर्चाचा मेळ उत्पादनाशी बसत नाही. जगाच्या पाठीवर तरुणांची संख्या सगळयात जास्त असल्याने ‘यंग इंडिया’ म्हणून आपला देश ओळखला जातो. आपल्या देशातल्या या तरुण मनुष्य-शक्तीला उत्पादन कार्याकडे आपल्याला वळवता आले पाहिजे. शेतीच्या क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक साधने, माहिती तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान हे मनुष्यबळाला पर्याय म्हणून येता कामा नयेत. त्याला सहाय्यकारी म्हणून आले तरच ख-या अर्थाने ई-ऍग्रीकल्चर आपल्या फायद्याचे ठरेल. त्यातून शेतकरी जगवता येईल आणि त्यामधूनच भारताची मूळ संस्कृतीही आपल्याला वाचवता येईल. भारत कृषक समाजाची स्थापना करणा-या पूजनीय भाऊसाहेबांनी ‘कृषीसंस्कृती ही सर्व संस्कृतीचे मूळ आहे’ असे म्हटले होते. त्यांच्या या शब्दांची आज प्रकर्षाने आठवण होते.
कालानुरूप बदल स्वीकारला नाही तर आपले अस्तित्व टिकविणे कोण्याही सजीवाला शक्य नसते. नव्या तंत्रज्ञानाच्या या महाजालातले अनेक बदल स्वीकारण्यासाठी लागणारी मानसिकता शिक्षक या नात्याने आपल्याला सिद्ध करावी लागणार आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये ती निर्माणही करावी लागणार आहे. अशा प्रकारच्या चर्चासत्रातून त्याकरिता लागणारी ऊर्जा आपणा सर्वांना लाभावी. शेती-मातीची उपमा देऊन सांगावयाचे झाल्यास-
‘वाफ्यातले जुने हे बदलू जरा बियाणे
तेव्हा कुठे इथेही उगवेल पेरलेले’
0 comments:
Post a Comment